वेटलॉससाठी केस हिस्ट्री का महत्त्वाची असते?
“वजन वाढलंय, किंवा वजन कमी करायचे आहे, काय करू?” अशी कोणी फेसबुकवर पोस्ट टाकली रे टाकली की रामबाण सल्लाबाण सुरु होतात.
पण सल्ले घेणारे आणि देणारे दोघांनी जरा सिरीयस होऊन विचार करायला पाहिजे.. का ते पुढे वाचा.
———– भाग एक ————
एक केस अशी:
एक मध्यमवयीन महिला. तीचे अचानक काही आठ-दहा महिन्यांपासून वजन वाढू लागले. तिला कळेचना काय होत आहे. अगदी बीएमआय चाळीस पर्यंत पोचला देखील. नॉर्मल बीएमआय पंचवीसपर्यंत असतो.
तिची केस हिस्ट्री घेतली तेव्हा कळले की घरातल्या कामासह ती आता नवऱ्याच्या व्यवसायात मदत करत आहे. ज्यात आधी तीचे सासरे काम करायचे ते काम आता ती करत आहे. त्यात तिला सकाळी चार वाजता उठावे लागते. बाहेर जाऊन बरीच कामे करावी लागतात जी दम आणि डोकं खाणारी असतात. दिवसभरात बाकी कामे असतातच. नंतर नवरा रात्री उशीरा घरी येतो कामावरून, त्याला खायला घालून रात्रीचे बारा वाजतात झोपायला.
म्हणजे उणेपुरे चार तास त्या व्यक्तीची झोप होत होती. आधीच त्यांचा बीएमआय पंचवीस-तीस च्या मध्ये होता आणि हे शेड्युल बदलले तेव्हापासूनच हळूहळू वजन वाढायला सुरुवात झाली.
चाळीसच्या आसपास बीएमआय असला म्हणजे वजन खूप जास्त असते. त्याने धाप लागणे, शक्ती कमी पडणे. गुंगी येणे, भूक-भूक होणे, पाय-टाचा दुखणे, कंबर दुखणे, उत्साह नसणे अशा अनेक गोष्टी दिसू लागतात. मग साहजिकच वजन कमी करायला हवे अशी गरज वाटू लागते.
लाइफस्टाइल आणि नजीकच्या काळात घडलेल्या घडमोडी, याबद्दल पूर्ण केस हिस्ट्री घेऊन त्याचे अनालिसिस केल्यावर लक्षात आले की अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढते आहे. या महिलेची समस्या आहे अपुरी झोप. जे अर्थात त्यांना कळत नाही. यात त्यांचा काहीही दोष नाही कारण झोपेचा वजनाशी संबंध असतो याची माहिती फारशी कोणाला नाही.
अशा व्यक्तीला कोणी फळेच खा, पनीर खा, मूगाची खिचडी खा, भात नको, रोज धावायला जा, प्राणायाम करा, कपालभाती करा, योग करा, अमुक खा, तेल बंद करा, भात बंद करा, मध-लिंबू टाकून पाणी प्या, तमुक पॅटर्न सुरु करा, असले उटपटांग सल्ले काहीही माहिती नसताना देऊ लागले तर कसे चालेल?
त्यांचे वजन कमी होण्यासाठी तर आधी त्यांची झोप पूर्ण होणे महत्वाचे आहे. कुटूंबाने परिस्थिती समजून घेऊन मदत करणे अपेक्षित आहे.
वेटलॉसच्या गोळ्या-औषधे, पावडरी, चहा, खाद्य, मशीन, शस्त्रक्रिया, अघोरी उपाय इत्यादी बाह्य प्रकारांनी तात्पुरता आणि जबरदस्तीचा परिणाम दिसेल, जो टिकणार तर नाहीच पण उलटणार तेव्हा आणखी भारी पडेल.
———– भाग दोन ————
झोप पूर्ण न होणे हा शरीरासाठी एक स्ट्रेस रिस्पॉन्स सिग्नल आहे. एक तर शरीराची डागडुजी, साफसफाई करण्याची ती हक्काची वेळ असते. डीटॉक्स, डीटॉक्स करत आपण मारे पातेलं भरुन ग्रीन-टी पोटात ओतत असू, पण खरा डीटॉक्स म्हणजे शांत, समाधानी पूर्ण झोप हेच असते. (एका केसमध्ये खरोखरच अशा रोज पाऊण ते एक लिटर ग्रीन टी – तेही झोपण्याआधी- पिणार्या व्यक्तीला ते बंद करायला सांगितले. तीची झोप सुधारली, उत्साह वाढला, मूड सुधारला, वजन कमी झाले.)
लोक काम, मनोरंजन आणि इतर अनेक कारणे देऊन झोप मारतात. जास्त झोप म्हणजे गुन्हा आणि कमीत कमी झोप म्हणजे शूरपणा असे वाटते. झोप म्हणजे आळशीपणा, बेजबाबदारपणा वाटतो. कमी झोप म्हणजे वेळेचा सदुपयोग वाटतो. अर्थात प्रत्येक शरीराची झोपेची गरज वेगवेगळी असते. पण कोणी कमी झोप घेणारा आदर्श नसतो.
अपुरी झोप वजन वाढण्याच्या कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण आहे. त्याचा घटनाक्रम साधारण पुढीलप्रमाणे असतो.
सर्वात प्रथम तणाव्/स्ट्रेस समजून घेऊया.
आपल्या प्रगत मेंदूच्या बुडाशी एक छोटासा सरड्याचा मेंदू आहे. त्याला फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथुन इतकेच चार भाव माहिती असतात.
भय हे सजीवाला जीवंत राहण्याची प्रेरणा देणारा भाव आहे. भीतीच्या भावनेत शरीर सामान्यपेक्षा वेगळ्या पद्धतीने व्यवहार करु लागते. त्याचे अशा संकटसमयी दोनच निर्णय घ्यायचे असतात. एकतर पळून जाणे किंवा लढाई करणे. हे निर्णय घेण्याची सूचना म्हणजेच स्ट्रेस. अशावेळी कॉर्टीसॉल हॉर्मोन स्रवायला सुरुवात होते.
बरेचदा भीतीने गाळण उडाली तेव्हा मलमुत्रविसर्जन किंवा उलटी झाली या घटना घडतात. कारण शरीराला पचनसंस्थेच्या कामात लागणारी शक्ती वाचवायची असते. त्यासाठी जे काही चालू काम असेल ते बंद करते. मलमूत्र विसर्जित करुन कोठा साफ करते. उलटी करुन अन्न बाहेर फेकून देते.
शरीराची इतर अनावश्यक कामे बंद होतात आणि शरीर पूर्णपणे लढणे किंवा पळणे ह्यासाठी आवश्यक इंद्रीय व अवयवांकडे शक्ती पुरवू लागते.
हे सगळे कॉर्टीसॉलमुळे घडू लागते. ही परिस्थिती काही मिनिटे ते काही तास राहील अशा उत्क्रांतीकालीन मॅकेनिजममध्ये आपली माणसाचीही शरीरयंत्रणा काम करत असते. नैसर्गिक पातळीवर बघितले तर आपल्यात आणि इतर प्राण्यांत फारसा फरक नाही.
फरक आलाय तो सामाजिक अवस्थेत. अशा अवस्थेत आपण जगत असतो जिथे कोणाचा राग आला, भिती वाटली तरी आपण पळून जात नाही, मारामारी करत नाही. आरडाओरडा-आदळाआपट यापैकी कोणतीही प्रतिक्रिया देण्याची मुभा सामाजिक संकेत आपल्याला देत नाहीत.
अशावेळी कॉर्टीसॉलचे काम पूर्ण होत नाही. स्ट्रेस तात्कालिक असायला हवा असतो तो कायमस्वरुपी जीवाला चिकटून राहतो. आणि स्ट्रेसमध्ये शरीर जसे नैसर्गिक वागणार असते तेच थोडेफार कमी-जास्त प्रमाणात दिवसेंदिवस काँस्टंट मोडमध्ये वागत राहते. इथेच सगळी गडबड सुरु होते.
स्टेप बाय स्टेप पाहूया:
१. झोप अपूरी होणे, त्यामुळे स्ट्रेस वाढणे.
>
२. कॉर्टीसॉल नावाचे स्ट्रेस हार्मोन जास्त प्रमाणात स्रवणे.
>
३. इन्शुलिन, घ्रेलिन, लेप्टीन, यासह चयापचयाला मदत करणार्या अनेक हार्मोन्सचे काम बिघडते.
>
४. शरीर सर्वायवल मोडमध्ये जाते. रक्तात साखरेचे प्रमाण वाढते, ब्लडप्रेशर वाढते.
>
५. चयापचय मंदावतो.
>
६. सतत भूकभूक होते. त्यात जास्तकरुन कार्ब्ज्/ग्लुकोज खाल्लं जातं. कारण ते पटकन पचतं आणि साखर रक्तात येते.
>
७. पोषक, हळू पचणारे पदार्थ खायची इच्छा होत नाही. गोड, चमचमीत, मनाला आनंद देणारे पदार्थ खाल्ले जातात.
>
८. वापरली न जाणारी जास्तीची साखर पेशींमध्ये फॅटच्या स्वरुपात साठवली जाऊ लागते. हीच ती चरबी जी पोटावर, मांड्यांवर, कमरेवर, जबड्याभोवती गोळा होऊ लागते.
असा हा घटनाक्रम स्ट्रेसमुळेच वजन झपाट्याने कमी होण्याच्या केसमध्येही (थोडेफार बदल वगळता ) दिसून येतो.
कष्टाची कामे करणार्या, जेमतेम खाणर्या व्यक्तींचेही वजन विनाकारण वाढण्यामागे वरील कारणे असू शकतात. हाय-प्रेशर जॉब्स, मानसिक त्रास देणारे नातेसंबंध, आर्थिक-सामाजिक परिस्थिती ह्यामध्ये सगळे सोडून पळून जाऊ शकत नाही, आणि एक घाव दोन तुकडे करु शकत नाही अशा विचित्र कैचीत अडकलेले शरीर कायम तणावग्रस्त राहत असते.
———– भाग तीन ————
यावर उपाय काय?
वर सांगितल्याप्रमाणेच प्रत्येक केस वेगळी असते व केसहिस्ट्री घेतल्याशिवाय उपाय सुचवणे योग्य नसते. तरी काही जनरल टिप्स आहेत ज्या ज्यांना जमेल तशा करुन पाहू शकतात.
१. दुनिया गेली तेल लावत, आधी आपली झोप झाली पाहिजे: किमान ७ ते ८ तास सलग. मग ते कधीही झोपा. कामाच्या वेळा मॅनेज करुन झोपा.
२. किमान पंधरा मिनिटे ते अर्धातास सूर्यस्नान. सुर्यप्रकाशात राहील्याने विटामीन डी मिळते हे तर माहितीच आहे सगळ्यांना. पण त्यासोबत मूड सुधारणारे सेरेटोनिन सुद्धा मेंदूत तयार होते, त्याने स्ट्रेस कमी होतो. सकाळी दहा ते दुपारी तीन वाजता पर्यंतचे ऊन फायदेशीर असते.
३. मानवी मन सृजनशील आहे. आपल्याला निर्मितीचा ध्यास आहे. काहीतरी निर्मिती केल्यावर आत्मिक आनंद मिळतो, तणाव निवळतो. आधुनिक जीवनशैलीत निर्मितीचा आनंद देणारे काम, रोजगार, आयुष्य फारसे उरलेले नाही. त्यामुळे असा छंद शोधा ज्यामध्ये स्वतःच्या हाताने, अॅक्टीवली काहीतरी निर्मिती करावी लागते. यात कागदावर पेनाने वेलबुट्टी काढण्यापासून ते पार लाकडावर-दगडावर कोरीवकाम करणे, लिहिणे, वाद्य वाजवणे, गाणे गाणे, नाचणे अशा कला, तर बागकाम, खेळ, संघटनात्मक कार्यात-मदतकार्यात स्वयंसेवक होणे, स्वयंपाक, रोजच्या परिसरापेक्षा वेगळ्या वातावरणात भटकायला जाणे, निरुद्देश भटकणे, जंगलफेरी, पोहणे, सायकलिंग, ट्रेकिंग, काही नविन शिकणे, शिकवणे, पाळीव प्राणी, अडगळीच्या वस्तू काढून टाकून घराची पुनर्रचना करणे, ध्यान, योगा, घरातल्या घरातच सर्वांनी मिळून स्वयंपाक करणे-खाणे-पिणे, यापैकी आणि याशिवायही अनेक संकल्पना वापरु शकता. यातल्या काही कृतींसाठी रोज दहा मिनिटे दिलीत तरी पुरेशी असतात. काही कृती आठवड्यातून एकदा, महिन्यातून दोनदा अशा पद्धतीने सुद्धा करता येतात. म्हणजे ‘वेळच मिळत नाही’ ही सबब नको.
४. त्रास देणारे नातेसंबंध तोडून टाका, अगदीच शक्य नसेल तर वाद मिटवून टाका. तणाव देणारी कामे-नोकर्या तणाव का देतात, ते शोधून, समजून त्यावर उपाय करा. खूप राग येत असेल, चिडचिड होत असेल तर काही तोडफोड करा, कागदं फाडा, कपडे फाडा (जुने हां..) जुन्या, कामात नसलेल्या वस्तू तोडा. सगळा निचरा होऊन जाऊ द्या. सरतेशेवटी आपले आरोग्य, आपले शरीर हेच महत्त्वाचे असते. बाहेरची ओझी शरिरावर-मनावर वागवणे हा आपल्या आयुष्यावर अन्याय असतो. आपल्याला आपले आयुष्य भरभरुन, भयमुक्त जगण्याचा पूर्ण अधिकार आहे.
वरीलपैकी काही गोष्टी सातत्याने करु लागल्यावरच त्याची परिणामकारकता दिसून येते. ‘उद्यापासून करु’ किंवा ‘आपल्याला कुठे वेळ आहे’ ह्या दोन बाबी मानायच्या सोडून आयुष्यावर नियंत्रण मिळवल्यास जे बदल दिसू लागतील ते दिसल्यावरच त्याची सत्यता आणि महत्त्व पटेल.
सोशलमिडियावर रमणारे बहुतेक लोक प्रत्यक्ष जीवनात स्ट्रेसला सामोरे जात असतात. त्यात किमान दोन ते चार तास सहज घालवतात. पण त्यामुळे आत्मिक शांती मिळत नाही. फक्त डोपामाइन मिळते. डोपामाइन मिळायला अगदी सोपे असते, पण स्ट्रेस कमी करायला फारसे उपयोगी नाही, तात्पुरती किक देणारे रसायन आहे. सेरेटोनिन हे दिर्घकाळ टिकणारा तृप्तीचा आनंद देणारे रसायन आहे. हे वर उल्लेख केलेल्या कृतींतून मिळते.
पोषक आहार, चांगली झोप, भरपूर सूर्यप्रकाश आणि कृतीपूर्ण छंद हे समाधानी मनाची व आरोग्यपूर्ण शरीराची चतु:सूत्री आहे असे म्हटल्यास हरकत नसावी.
.
.
डिस्क्लेमरः वरील लेख कोणत्याही स्वरुपात वैद्यकिय सल्ला नाही. आपल्या जीवनशैलीत, आहारविहारात बदल करण्यापूर्वी अनुभवी आहारतज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे (खरेतर ह्या डिस्क्लेमरसाठीच हा लेख लिहिलाय ना!!! 🙂 )
© Betterfast Lifestyle Consultancy